‘माणिक रत्न’ पुरस्काराने अश्विनी भिडे-देशपांडे यांचा गौरव   

मुंबई : ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. याकरिता हे वर्ष माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे ‘माणिक स्वर शताब्दी’ २०२५-२०२६ म्हणून साजरे होणार आहे. जन्मशताब्दीचे  औचित्य साधत आयोजित विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांचा सन्मान ‘तालयोगी’ पं.सुरेश तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आला. तुळशी वृंदावनचे सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देत ’माणिक रत्न’ पुरस्कार अश्विनी भिडे-देशपांडे यांना याप्रसंगी प्रदान करण्यात आला. वंदना गुप्ते, भारती आचरेकर, अरुणा जयप्रकाश, राणी वर्मा आणि चौरंगचे अशोक हांडे यावेळी  उपस्थित होते.
 
अश्विनी भिडे-देशपांडे म्हणाल्या की, माणिक वर्मा यांच्या सोबत माझे वेगळे नाते होते, त्यामुळे त्यांच्या या ‘स्वरोत्सवात’ माझा हा सन्मान होणं मी भाग्याचे समजते’. माणिक वर्मा यांच्या आठवणींना उजाळा देताना पं.सुरेश तळवलकर म्हणाले की, नम्र स्वभावामुळे माणिकताईंनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. आजही एवढ्या मोठ्या संख्यने उपस्थित असलेले रसिक ही त्यांच्यावरील प्रेमाची व त्यांच्या कलेच्या यशाची पावती आहे’. 
 
‘माणिक मोती’ या कार्यक्रमाचे लेखन-दिग्दर्शन करणारे चौरंगचे अशक हांडे यांनी सांगितले की, आपल्या कलेचा ठसा उमटविणार्‍या जुन्या व्यक्तिमत्वांची आठवण आपण ठेवायलाच हवी.या पुरस्कार सोहळ्यानंतर चौरंगचे अशोक हांडे आणि माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे माणिक वर्मा यांच्या जीवनावरील ‘माणिक मोती’ कार्यक्रम सादर झाला. रस्ते विकास महामंडळ यांनी हा कार्यक्रम पुरस्कृत केला होता. 

Related Articles